Friday, February 12, 2021

बालगांवमध्ये सापडला चालुक्यकालीन शिलालेख


जत तालुक्यातील बालगांव येथे चालुक्यराजा तिसरा सोमेश्वर उर्फ भूलोकमल्ल याच्या कारकिर्दीतील त्याचा मांडलिक बिज्जल कलचुरी याने दिलेला दानलेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर यांनी शोधून काढला आहे. सन 1137 मधील हा लेख असून, यामध्ये बालगांव येथील कळमेश्वर स्वामी यांना दान दिल्याचे म्हटले आहे. सुमारे 884 वर्षांपूर्वीच्या या लेखातून सांगली जिह्याच्या तत्कालीन राजकीय व धार्मिक इतिहासावर प्रकाश पडणार आहे.

बालगांव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेले सांगली जिह्यातील शेवटचे गांव आहे. पंढरपूर-विजापूर महामार्गावर वसलेल्या या गावाला प्राचीन इतिहास आहे. येथील अल्लमप्रभूचे देवस्थान हे महाराष्ट्र-कर्नाटकातील भाविकात प्रसिध्द आहे. याच बालगांवमध्ये मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे संशोधन करीत असताना त्यांना अल्लमप्रभू देवस्थानालगत हळेकन्नड लिपितील एक शिलालेख आढळून आला. तो भग्नावस्थेत होता. त्याच्या वरच्या भागातील 13 ओळीच फक्त शिल्लक राहिल्या आहेत. या शिलालेखावर सुर्य-चंद्र, शिवलिंग, गाय-वासरू, कटय़ार अशी चिन्हे कोरली आहेत. हा शिलालेख पूर्वी मारुतीच्या देवळात होता. शिलालेख अभ्यासासाठी सागर कांबळे, डॉ. महेंद्र बोलकोटगी (जमगी), प्रभाकर सलगर (बालगाव), मधू पाटील (बालगाव) यांची मदत झाली.
  या लेखात बालगांवमधील कळमेश्वर स्वामींना बिज्जल कलचुरी राजाने सुर्यग्रहणाच्या दिवशी दान दिल्याचा उल्लेख आहे. या लेखाच्या प्रारंभी कलचुरी राजा बिज्जल याच्या बिरुदावल्या आल्या आहेत.* कलचुरी राजांमध्ये बिज्जल कलचुरी हा पराक्रमी राजा होता. चालुक्यराजा दुसरा जगदेकमल्ल आणि भूलोकमल्ल याचा तो मांडलिक होता. त्याने महामंडलेश्वर ही पदवी चालुक्य राजांकडून प्राफ्त करुन घेतली होती. त्याला पंचमहाशब्दांचा मान मिळाला होता. तसेच शंख, भेरी, मृदंग, श्रृंग व घंटा ही वाद्ये वाजविण्याचा सन्मान मिळाला होता. तसेच आगमन आणि गमनप्रसंगी त्याचे स्वागत डमरुग आणि तुर्य ही वाद्ये वाजवून करण्याचाही मान त्याला होता.
बालगांवमधील लेखात तो मंगळवेढे येथून राज्य करीत असल्याचा उल्लेख आहे. या लेखात त्याला लावलेल्या विशेषणांमध्ये युध्दात शत्रूला अत्यंत घनघोर वाटणारा, शूरवीरांचा सूर्य, कलिकालाच्या गळ्यावर रोखलेला अंकुश, शत्रूरुपी हत्तींचा नाश करणारा सिंह, निर्भयपणे पराक्रम गाजविणारा वीर आणि परनारी सहोदर म्हणजे परस्त्रीचा बंधू यांचा समावेश आहे. त्याने बालगांवमधील एका स्वामींना पिंगळनाम संवत्सराच्या वर्षी सोमवार असताना कार्तिक महिन्यात दान दिल्याचे म्हटले आहे. यावेळी चालुक्यराजा भूलोकमल्ल तथा तिसरा सोमेश्वर याच्या राज्यारोहणाचे 13 वे वर्ष सुरू होते. बिज्जल कलचुरीचा हा जिह्यात सापडलेला कालदृष्टय़ा पहिला शिलालेख आहे. बिज्जल कलचुरी हा चालुक्यांचा नातेवाईक होता. चालुक्यराजा सहावा विक्रमादित्याची पत्नी चंदलदेवी ही बिज्जलाची आजी होती. बिज्जल राजा हा पराक्रमी होता. प्रारंभी तो चालुक्यांचा मांडलिक असला तरी त्याने 1156 मध्ये चालुक्याचे मांडलिकत्त्व झुगारुन देऊन सध्याच्या सांगली, सातारा, सोलापूर या भूभागावर आपली सत्ता प्रस्थापित केली.
मिरज इतिहास संशोधक मंडळाच्या अभ्यासकांना बालगांव येथे सापडलेल्या या नव्या शिलालेखामुळे सांगली जिह्यातील सुमारे 884 वर्षांपूर्वीच्या राजकीय आणि धार्मिक इतिहासावर प्रकाश पडणार आहे.
बिज्जल कलचुरी याच्या ताब्यात सध्याच्या सांगली जिह्याचा बहुतांशी भाग होता. त्यामुळे जिह्याच्या विविध भागात त्याचे शिलालेख आजवर आढळून आले आहेत. यामध्ये देशिंग-बोरगांव, भाळवणी, वळसंग याठिकाणी त्याच्या कारकिर्दीतील शिलालेख सापडले आहेत. या शिलालेखांमधून कल्याणीचे चालुक्य राजे आणि त्यांचे मांडलिक असलेल्या कलचुरी राजसत्तांची माहिती मिळते. कालदृष्ट्या कलचुरीचा पहिला शिलालेख आहे. बिज्जल कलचुरीचा हा जिल्ह्यात सापडलेला कालदृष्ट्या पहिला शिलालेख आहे. तो चालुक्यांचा नातेवाईक होता. चालुक्यराजा सहावा विक्रमादित्याची पत्नी चंदलदेवी ही बिज्जलाची आजी होती. बिज्जल राजा हा पराक्रमी होता. प्रारंभी तो चालुक्यांचा मांडलिक असला तरी त्याने ११५६मध्ये चालुक्याचे मांडलिकत्व झुगारून सध्याच्या सांगली, सातारा, सोलापूर या भूभागावर सत्ता प्रस्थापित केली.दरम्यान, आपल्या भागात असे शिलालेख असल्यास संपर्क साधावा आवाहन मानसिंगराव कुमठेकर 9405066065, व प्रा. गौतम काटकर 9881550706) यांनी जतवासियांना केले आहे.

Tuesday, December 15, 2020

बुद्धिबळातील 'लिटल चॅम्प' : श्रेया हिप्परगी

जागतिक बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड


सध्या पाचवीच्या वर्गात शिकत असलेली श्रेया हिप्परगी बुद्धीबळ स्पर्धांमध्ये  चमकदार कामगिरी करत आहे. वडिलांची मदत, मोबाईल आणि संगणक हेच बुद्धिबळाच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे साधन असलेल्या श्रेयाने जतसारख्या ग्रामीण भागाचे नाव जगाच्या नकाशावर नेले आहे. संख येथील राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशालेत शिकत असलेल्या श्रेयाची १९ डिसेंबरपासून सुरू  होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या दहा वर्षांखालील आशियाई बुद्धिबळ  स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्यामुळे तिची निवड झाली. गेल्या काही वर्षात अनेक स्पर्धातून  पारितोषिके पटकावली आहे. नुकतेच ११ ते १३ डिसेंबर अखेर आंतरराष्ट्रीय आशियाई बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन स्पर्धा झाली. त्यामध्ये दहा वर्षाखालील  मुलींच्या गटात सातपैकी सहा फेऱ्या  जिंकून श्रेया हिने द्वितीय क्रमांक  पटकावला. स्पर्धेत आशिया खंडातील  २० देशातील खेळाडू सहभागी झाले होते. तिने द्वितीय क्रमांक पटकावून देशाची मान उंचावली. तिच्या निवडीमुळे सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्रेया सध्या नागपूरचे आंतरराष्ट्रीयमास्टर अनुप देशमुख यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे. 

जत तालुक्यातील सिंदूर येथील गुरू हिप्परगी सध्या संख येथे माध्यमिक शिक्षक आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेताना बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. याच खेळाची गोडी मुलगी श्रेयालाही लागावी यासाठी त्यांनी तिला वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळाच्या खेळाचे प्राथमिक धडे देणे सुरू केले. तिला या खेळाची प्रचंड गोडी लागली. त्यानंतर दोन वर्षांत प्रत्येक स्पर्धेत तिने सहभाग घेत यश मिळवले. काही वर्षांपूर्वी सांगली येथे झालेल्या  जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहा प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत तिने प्रथम, तर राज्य बुद्धिबळ संघामार्फत मुंबईत झालेल्या ७ वर्षे वयोगटातील स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत राज्यातील ७० स्पर्धकांनी भाग घेतला होता. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ७ वर्षे वयोगटाखालील एकूण १२५ स्पर्धकांमध्ये श्रेया दुसरी आली. थायलंडमध्ये १ ते १० एप्रिल या कालावधित झालेल्या ८ वर्षाखालील स्पर्धेत आशिया खंडातील ६० स्पर्धकांमधून श्रेयाने रौप्य व कास्यपदकाची कमाई केली.

थायलंड येथील स्पर्धेसाठी तिला शासनाकडून आर्थिक मदत मिळाली होती. तिच्या कुटुंबियांनी तर दीड लाख रुपये खर्च केले होते.  स्पेन येथे झालेल्या स्पर्धेतही तिने यश मिळवले होते.  संगणक, मोबाईलवर विश्वनाथन आनंद, गॅरी कास्पोरोव यांसारख्या जागतिक दर्जाच्या बुद्धिबळपटूंच्या खेळातील चालीचा अभ्यास ती करीत आहे.

आशियाई स्पर्धेतील कामगिरीमुळे तिची १९ डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या  जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड  झाली आहे. त्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे. तिला संस्थेचे संस्थापक बसवराज पाटील,  संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील,  शाळेचे मुख्याध्यापक श्री. कनूर, ए. एस. बिराजदार, दिपक वायचळ मार्गदर्शन लाभत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Friday, November 27, 2020

महात्मा बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी


जत तालुक्याला प्राचीन आणि ऐतिहासिक इतिहास आहे. रामायण आणि महाभारत याचबरोबर शिलाहार, कलचुरी, देवगिरीचे यादव, मोगल, विजापूरची आदिलशाही आणि शिवशाही अशा सर्व राजवटींच्या काळात जत तालुक्याला महत्त्व होते. सांगली जिल्ह्याच्या एका पूर्व टोकाला असलेल्या आणि आकाराने विस्तीर्ण असलेल्या जत तालुक्यात प्राचीन काळापासून इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. तालुक्याचे ठिकाण असलेले जत शहर(जयंत नगरी), संख, उमदी, उमराणी(प्राचीनकाळी उंबरवनी), माडग्याळ (प्राचीन नांव माडगीहाळ), सिंगनहळ्ळी, लोणार,डफळापूर ही व अन्य अनेक गांवे प्राचीन आहेत. सुमारे साडेसातशे वर्षापूर्वी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या इतिहासात पराक्रमाचा ठसा उमटविणारे देवगिरीचे राजे सिंघनदेव आणि संकमदेव यादव या तालुक्यात येऊन गेलेले आहेत.त्यांच्या नांवाने ओळखली जाणारी सिंघनहळ्ळी व संख अशी गांवे आजही या तालुक्यात आहेत.विशेष म्हणजे सिंघनहळ्ळी या लोणारीबहूल गावात लोणारी समाजाची लोकसंख्या ९०%च्या आसपास आहे.तर संख व परिसरातील गोंधळेवाडी, सोरडी, आसंगी, जाल्याळ, दरिबडची, माणिकनाळ, खंदनाळ या गावात लोणारी समाजाची लोकसंख्या दखलपात्र आहे.तर सिंघनहळ्ळी या ऐतिहासिक गावाच्या शेजारी लोणारवाडी (वाळेखिंडी), काशिलिंगवाडी, बागलवाडी ही अशीच लोणारीबहूल गावे आहेत.जत ही महात्मा बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमि आहे. म्हणून जत तालुक्यात हिंदू लोणारी बरोबर लिंगायत-लोणारी समाजाची संख्याही लक्षणीय आहे.

खुद्द जतमध्ये श्रीबंकेश्वर,माडग्याळमधील श्री महादेव आणि उमराणीतील हेमलिंगेश्वर ही मंदिरे अतिप्राचीन असून तीनही ठिकाणी प्राचीन हळेकन्नड किंवा कन्नड भाषेतील शिलालेख आहेत. अलीकडेच गुगवाड येथेही एक कन्नड शिलालेख आढळून आले आहे.त्यावरून जत तालुक्याच्या इतिहासावर प्रकाश पडतो.छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा पराक्रम या तालुक्याने पाहिलेला आहे.विजापूरच्या आदिलशाहाचा सरदार बहलोलखान याच्या चतुरंग सैन्याचा प्रतापराव गुजर यांनी उमराणीजवळ पराभव केला आणि बहलोल खान शरण आला. जतच्या डफळे घराण्याशी सुमारे चारशे वर्षाच्या पराक्रमाचा इतिहास जोडलेला आहे.राजस्थानमधील पराक्रमी दुधात हाडा चौहान राजपूत वंशाबरोबर जतच्या डफळे घराण्याचा इतिहास निगडित आहे.डफळे घराण्याला  सर्जनसिंह, शामलसिंह, शार्दूलसिंह, सटवाजी अशा पराक्रमी पुरुषांची परंपरा या घराण्याला आहे.

उमराणीचे डफळे म्हणजे जतच्या डफळे राजघराण्याची एक स्वतंत्र गादी आहे.डफळे घराण्याचे संस्थापक श्रीमंत सटवाजीराजे यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांचे पुत्र बाबाजीराजे व खानाजीराजे यांचे निधन झाले होते.श्रीमंत सटवाजीराजे यांच्या सुनबाई राणी येसूबाई यांनी १७०७ ते १७३८ सालापर्यंत डफळे संस्थानाचा राज्यकारभार एकहाती सांभाळला. १७३८ साली राणी येसूबाई यांनी आपले सावत्रदीर खानाजीराव यांच्या चारही मुलांना दत्तक घेतले.दत्तकानंतर यशवंतराव, रामराव,भगवंतराव व मुकुंदराव हे डफळे संस्थानाचे वारस झाले.या चारही मुलांना राणी येसूबाई यांनी आपली जहागिरी वाटून दिली.थोरले यशवंतराव यांना जत,दुसरे रामराव यांना डफळापूर,तिसरे भगवंतराव यांना उमराणी तर सर्वात लहान असलेले मुकुंदराव यांना सध्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात असलेल्या हुलजंतीची जहागिरी दिली.

पूर्वीच्या जत संस्थानातील पण नंतरच्या हुलजंती संस्थानातील अर्थात आताच्या मंगळवेढा तालुक्यातील "लोणार"या गांवात प्राचीनकाळी जमिनीतून मीठ काढण्याची पद्धत होती."लोणार"या गांवाचा तशा खनिज मिठासंदर्भात अभ्यासकांनी प्राचीन शिलालेखात उल्लेख केलेला असल्याची माहिती इतिहास अभ्यासक चिंतामणी सहस्रबुद्धे यांच्या "इतिहासाची सुवर्णपाने"या पुस्तकात केलेला आहे.माडगीहाळ किंवा मडीहाळ(आज माडग्याळ ता.जत)येथील महादेव मंदिरातील शिलालेखही (२७ जानेवारी ११७२,नंदन संवत्सर शके १०९३) प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकतो.या ठिकाणी माडग्याळचा मालिंगे असा उल्लेख आहे,याशिवाय वासुबिंगे(वासुंबे ता.तासगांव)लोणार ता.जत आणि कोळनूर या गांवाचा उल्लेख आहे.पण "लोणार"या पूर्वीच्या जत संस्थानातील गांवात १२ व्या शतकात खनिजमातीपासून मीठ काढले जात होते,असा शिलालेखात उल्लेख आहे.

Wednesday, October 28, 2020

वज्रवाड येथे 650 वर्षांपूर्वीचा शिलालेख


जत तालुक्यातील वज्रवाड येथे ओढ्याच्या काठावर बसवेश्वर मंदिर आहे. हे मंदिर ऐतिहासिक असून चालुक्यांच्या काळात बांधण्यात आले असावे,असे इतिहासकार सांगतात. हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून सभामंडप ,अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन भागात उभारलेले आहे. परंतु  जुना सभामंडप नष्ट झाला आहे तर अंतराळ आणि गाभारा शिल्लक आहे. अंतराळ भागात दगडी भिंतीवर हळे कन्नड भाषेतील एक शिलालेख कोरला आहे. 12 ओळींचा हा शिलालेख तीन टप्प्यात आहे. मात्र या लेखावर ऑईलपेंटने रंगवण्यात आल्याने तो अस्पष्ट झाला होता. हा ऑईलपेंट काढण्यात आल्यानंतर त्यावरील अक्षरे सुस्पष्ट दिसू लागली. सदर शिलालेखाचा अभ्यास मिरज येथील इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा.गौतम काटकर यांनी वज्रवाड येथे येऊन केला. हंपी येथील डॉ.कलवीर मंवाचार्य यांच्याकडून त्याचे वाचन करून घेण्यात आले. 1371 मध्ये या बसवेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.त्याचीच नोंद करण्यासाठी हा लेख कोरून ठेवण्यात आला. यावं काळात देवगिरीच्या यादवांची सत्ता नष्ट होऊन मुस्लिम राजसत्तेचा अंमल या भागावर होता. अशा काळात या मंदिराचा जीर्णोद्धार वज्रवाड येथील प्रसिद्ध व्यापारी गोपाळ शेट्टी यांचा मुलगा याने केला. सदर मूळ मंदिर म्हणजे शिवालय आहे. सध्या मात्र बसवेश्वर मंदिर या नावाने ते ओळखले जाते. या मंदिराची रचना आणि बांधणी वैशिष्ट्यपूर्ण असून ते उत्तर चालुक्यांच्या काळात बांधलेले असावे. 

वज्रवाड येथे जो शिलालेख सापडला आहे. त्या लेखात तत्कालीन प्रसिद्ध अशा वीरवणज या व्यापारी श्रेणीचा म्हणजे संघटनेचा उल्लेख आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या या गावात आढळलेल्या या शिलालेखामुळे सांगली जिल्ह्याच्या इतिहासात अभ्यासकांच्या दृष्टीने एक नवी भर पडली आहे. या व्यापाऱ्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी आणि जीर्णोद्धारासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती या शिलालेखाच्या अभ्यासातून स्पष्ट होते.

या शिलालेखात शके 1293 मध्ये साधारण नाम संवत्सराच्या फाल्गुन शुद्ध द्वितीयेला रोहिणी नक्षत्र असताना सिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार गोपाळ शेट्टी यांच्या मुलाने केला असल्याचे म्हटले आहे. तीन फेब्रुवारी सन 1371 अशी इंग्रजी तारीख येते. हे शिवालय असून त्याच्या अंगभोग आणि रंगभोगासाठी काही जमीन ब्राह्मणांना दान देण्यात आली आहे. शेवटी हा शिलालेख नष्ट करू नये, अशा आशयाचे वाक्य लिहिले आहे. सांगली जिल्ह्याच्या मध्ययुगीन इतिहासाच्या दृष्टीने या लेखाचे महत्त्व आहे.

Sunday, September 27, 2020

उमराणी येथील डफळे सरकार यांचा वाडा


जतच्या दक्षिणेला  कर्नाटक सीमेवर प्रतापराव गुजर यांच्या लढाईने प्रसिद्धीस आलेले  उमराणी गाव आहे.  प्राचीन इतिहास असलेल्या या गावाला अनेक राजसत्तांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. उमराणी येथील प्राचीन मंदिरात इ.स. ११ व १२ व्या शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात. यात कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दान दिल्याची नोंद येते. पण शिवकाळात उमराणी प्रसिद्धीस आले ते येथे घडलेल्या प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमामुळे.  इ.स. १६७३ साली राज्याभिषेकापूर्वी काही महिने  महाराज पन्हाळगडावर असताना अदिलशाही सरदार अब्दुल करीम बहलोलखान हा बारा हजार स्वार घेऊन स्वराज्यावर चाल करुन आला. ही वार्ता  समजताच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांस खानावर रवाना केले. त्यांना आज्ञा दिली की “खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे. महाराजांच्या आज्ञेनुसार  प्रतापराव बहलोलखानावर चालून गेले. यावेळी बहलोलखानाचा मुक्काम कर्नाटक सीमेवर असलेल्या उमराणी गावाजवळील डोण नदीकिनारी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम खानाचे पाणी तोडले व दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला केला. पाण्याशिवाय कासावीस झालेल्या खानाला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता. बेहलोलखानाने प्रतापराव व मराठा सैन्यासमोर शरणागती पत्करली. प्रतापरावांनी त्याला माफी दिली. शरण आलेला बहलोलखान मराठ्यांसमोर पराजीत होऊन मागे निघून गेला.  हि बातमी महाराजांना कळल्यावर ते चिडले. महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परत येईल अशी शंका त्यांना होती. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून “सला काय निमित्य केला?  असा जाब विचारला व तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले आणि यानंतरच नेसरी खिंडीत प्रतापराव यांचे बलीदान नाट्य घडले. याशिवाय उमराणी गावास असलेला इतिहास म्हणजे जत संस्थानाचे राजे डफळे सरदार यांचा इतिहास. डफळापूरचे  पाटील सटवाजी चव्हाण यांनी  १६८० च्या सुमारास आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर  डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले.  संभाजीराजांच्या मृत्युनंतर सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या १६००० सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला. पेशवाईत आऊसाहेब डफळे (१७०१–५४) यांनी पेशव्यांची अधिसत्ता मान्य करत संस्थानाचे  स्वतंत्र कायम ठेवले. दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्रिंबकजी डेंगळेकडे या संस्थानचा कारभार सोपविला होता. १८२० मध्ये इंग्रजांनी तह करून सातारच्या छत्रपतींची अधिसत्ता मान्य करविली. त्यानुसार १८४६ नंतर ३ वर्षे राजा अल्पवयीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता. सातारा खालसा झाल्यावर (१८४८) संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले. उमराणी गाव सांगली शहरापासुन ८३ कि.मी.वर असुन जत या तालुक्याच्या शहरापासून  २० कि.मी. अंतरावर आहे. जत संस्थाना अंतर्गत उमराणी हे एक महत्वाचे ठिकाण असल्याने डफळे घराण्याचे येथे अनेकदा वास्तव्य असे. उमराणी गावात आजही राजे डफळे यांची गढी असुन त्यांचे वंशज तेथे वास्तव्य करून आहेत.  सटवाजीराजे चव्हाण यांच्या नंतरच्या काळात  हि गढी बांधली गेली असावी. साधारण अर्धा एकर परिसरात पसरलेली हि गढी चौकोनी आकाराची असुन गढीच्या चार टोकाला चार बुरुज आहेत. सध्या या गढीचा वापर डफळे यांचे वंशज करत असुन त्यांनी या गढीला तिच्या मूळ स्वरुपात कायम ठेवले आहे. गढीबाहेर दरवाजा शेजारी आपल्याला गजलक्ष्मी  शिल्प पहायला मिळते. गढीची तटबंदी काही प्रमाणात ढासळली असुन या गढीच्या  चार टोकाला असलेले चार बुरुज व गढीचा दरवाजा आजही पहायला मिळतो. गढीच्या आवारात दगडात बांधलेली  खोल विहीर असुन डफळे यांचा चौसोपी वाडा आहे.  गढीतील या वाड्याचे बांधकाम आजही मूळ  स्थितीत बांधकामातील लाकडावर अतिशय सुंदर कोरीवकाम केले आहे. वाड्यात राजे डफळे यांचे वास्तव्य असल्याने मर्यादित भागात प्रवेश दिला जातो.  गावात फेरी मारताना काही प्राचीन मंदिरे पहायला मिळतात. उमराणी गढी व आसपासचा परिसर  पहाण्यास दोन तास पुरेसे होतात.



Saturday, September 12, 2020

सामुहाहिक विवाहाची मुहूर्तमेढ रोवणारे संगतीर्थ


महाराष्ट्र-कर्नाटकतल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. धानम्मादेवीच्या विवाहस्थळाला म्हणजेच संगतीर्थ(वळसंग) या धार्मिक स्थळाला श्रावण मासात भाविक मोठ्या संख्येने भेट देऊन तृप्त होतात.जतसारख्या दुष्काळ ओसाड भागात काहीशा दरित वसलेले हे निसर्गरम्य तीर्थक्षेत्र म्हणजे वाळवंटातले ओअ‍ॅसिस म्हटले पाहिजे. श्रावणात भाविकांबरोबरच शाळांच्या सहलीदेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात.

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी जत तालुक्यातले श्रीक्षेत्र गुड्डापूर येथील धानम्मादेवीचे मंदिर म्हणजे एक जागरूक देवस्थान मानले जाते. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातले लाखो भाविक मोठ्या संख्येने इथे येत असतात. गुड्डापूरला भेट देण्याआधी भाविक संगतीर्थला आवश्य भेट देतात.वळसंग गावापासून सोरडी मार्गावर अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर संगतीर्थ आहे. धानम्मा हिचा जन्म उमराणी गावचा असला तरी  संगतीर्थ इथे तिने 21 दिवस तपश्‍चर्या केली. हा काळ बाराव्या शतकातला असून ज्या वडाच्या झाडाखाली धानम्माने तपश्‍चर्या केली, ते झाड आजही इथे दिमाखात उभे आहे. त्याच्या थंडगार सावलीखाली विसावा घेणार्‍या भाविकांना एक प्रकारे धार्मिक समाधान मिळते.

धानम्माच्या तपश्‍चर्येमुळे भाविक तिच्या दर्शनाला येत राहिले. मात्र या वाळवंट परिसरात पाण्याचा थेंबदेखील नव्हता.  लोकांच्या सांगण्यावरून धानम्माने इथे शंख फुंकला आणि इथे गंगा अवतरली, अशी अख्यायिका आहे.त्यामुळे या ठिकाणाला संखतीर्थ म्हटले जात होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन संगतीर्थ असे नाव या क्षेत्राला पडले. या मंदिराचा पायथ्याशी जिवंत झरा असून बारमाही या ठिकाणी पाणी असते. त्यामुळे या परिसरातल्या लोकांना , भाविकांना पाण्याची टंचाई कधी भासली नाही. इथले पाणी प्यायला गोड, मधुर आहे. भाविक पिण्याच्या बाटल्या भरून तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात.

धानम्मा पुढे कुडलसंगम(कर्नाटक) इथे गेली. तिथेही तिने तपश्‍चर्या केली. पुढे कुडलसंगमचा सोमेश्‍वर आणि धानम्मा यांचा विवाह संगतीर्थ इथे झाला. या ठिकाणी 501 जोडप्यांचा सामुदायिक विवाह पार पडला. त्यात सोमेश्‍वर आणि धानम्मा यांचाही समावेश होता. ही सामुदायिक विवाहाची मुहूर्तमेढ होती. त्यानंतर इथे सामुदायिक विवाह होऊ लागले. आजही इथे विवाह होतात. श्रावणात दरवर्षी तिसर्‍या सोमवारी इथे अक्षता पडतात. भाविक धानम्माचा विवाह उत्सव साजरा करतात. या ठिकाणी वडाच्या पारंब्यातून निर्माण झालेल्या खोडाला श्री गणेशाची स्वयंभू प्रतिमा तयार झाल्याचे आपल्याला दिसते.

हा परिसर निसर्गरम्य असा असून वळसंगच्या श्री. धानम्मा ट्रस्टने भाविकांच्या निवासासाठीही अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. बारा महिने याठिकाणी अन्नछत्र (दासोह) उघडण्यात आले आहे. भाविक मोठ्या भक्तीभावाने त्याचा प्रसाद म्हणून आस्वाद घेतात. पावसाळ्यातली किंवा श्रावणातील सहकुटुंब छोटी सहल म्हणून या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला काहीच हरकत नाही. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

Monday, July 6, 2020

जालिहाळ बुद्रुकची स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल

ग्रामविकासाच्या अनेकजण गप्पा मारतात, सरकारी पातळीवर तर रामराज्यापासून स्मार्ट व्हिलेजपर्यत अनेक घोषणा झाल्या पण देशातील व महाराष्ट्रातील खेडी सुधारणांपासून, विकासापासून कोसो मैल दूर राहिली, स्थलांतर होत राहिली. शहरात गर्दी वाढली. ना ग्रामविकास ना शैक्षणिक सुधारणा, ना शेतीला पाणी, ना हाताला काम. पूर्वजन्मीचं पाप म्हणून कायमस्वरूपी दुष्काळी भागात जन्माला यायचं आणि दुष्काळी पट्ट्यातच विकासापासून वंचित आयुष्य कसं बसं ओढायचं असं निराश, हताश जीवन जगणाऱ्या जनतेला एक आशेचा दीप गवसलाय येरळा प्रोजेक्ट सोसायटी आणि जालिहाल पॅटर्न.