Tuesday, January 30, 2024

जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

सांगली : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. दारिद्य्राशी झुंजणारे कुटुंब, वडापचे वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणारे वडील अशा वातावरणातून आलेल्या मुलाने जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक


पटकाविले.दुष्काळी उमदी (ता. जत) येथील वडाप चालकाचा मुलगा निखिल नागप्पा कोळी याने तामिळनाडू येथे खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात ९३ किलो व क्लीन अँड जर्क या प्रकारात ११९ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले.निखिल सध्या सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर हायस्कूलमध्ये बारावीत शिकत आहे. उमदी येथील क्रीडा प्रशिक्षक संजय नांदणीकर यांनी वेटलिफ्टिंगचे त्याला प्रशिक्षण दिले. निखिल याने संभाजीनगर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने अरुणाचल प्रदेश येथील राष्ट्रीय युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत त्याची निवड झाली होती. तेथील कामगिरीच्या जोरावर तो तामिळनाडू येथे खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी झाला होता. राष्ट्रीय स्तरावरही त्याने यशाची कहाणी नोंदविली.निखिलची परिस्थिती बेताची आहे. वडापचालक म्हणून काम करीत वडिलांना कुटुंबाचा भार उचलावा लागत आहे. मात्र, जबाबदारीचा भार उचलत निखिलने भारोत्तलनात चमक दाखवून वडिलांच्या कष्टाला यशाचे कोंदण लावले. निखिलला सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एस.के. होर्तीकर यांनी मोठे पाठबळ दिले. देशपातळीवर यशाचा झेंडा रोवण्याची निखिलमधील क्षमता ओळखून होर्तीकरांनी त्याला प्रोत्साहन दिले. स्पर्धेत सहभागी व्हायचे म्हटल्यावरही पैशाचा भार पडतो. हा भार पेलण्याचे काम शिक्षण संस्थेने केली.निखिलचे प्रशिक्षक असलेले संजय नांदणीकर यांनीही त्याची जिद्द व प्रामाणिकपणा ओळखला होता. पहाटे कितीही वाजता सरावाला येण्याची त्याची तयारी, अनेक तास सराव करण्याची मानसिकता त्याच्यात होती. नांदणीकरांना त्याच्यातील हा गुण भावला. राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू घडविणाऱ्या नांदणीकरांनी निखिलची जबाबदारीही स्वीकारली. त्यांनीही तेवढीच जिद्द दाखवित त्याला यशापर्यंत पोहोचविण्यास मदत केली.

निखिलने यशासाठी खूप कष्ट घेतले आहेत. एवढ्या यशावर न थांबता पुढील एशियन गेम्सकरिता आम्ही तयारी करणार आहोत. देशाचे नाव मोठे करण्याची क्षमता निखिलमध्ये आहे.- संजय नांदणीकर, प्रशिक्षक, उमदी (ता. जत)

Sunday, January 21, 2024

जत: डफळापुरातील प्राचीन राम मंदिर आहे शिवशाही काळातील


 येथील श्री राम मंदिराचा कालावधी सन १६७०-१६८० सांगितला जातो. येथील श्रीराम मंदिर  गावच्या मध्यभागी प्राचीन राजवाडा परिसरात आहे. डफळापूर व जत संस्थानचे संस्थापक सटवाजीराव चव्हाण  यांनी जत, कारजनगी, होनवाड व बारडोल प्रांताची देशमुखी प्राप्त केल्यानंतर येथे राजवाडा बांधला.

श्रीराम मंदिर याच काळात बांधले असावे. डफळापूर संस्थानच्या वार्षिक (१८५०-१९१७) अहवालात चव्हाण घराण्यातील खासगी मालकीच्या राममंदिरावर केलेल्या खर्चाच्या नोंदी आहेत. संस्थानचे शेवटचे शासक रामचंद्रराव चव्हाण  होते. त्यांच्या मृत्यूनंतर राणीबाई चव्हाण यांनी कारभार केला. राणीबाई यांनी मंदिराभोवती १९१३-१४ मध्ये बांधकाम केल्याची नोंद आहे.

संस्थानमध्ये रामनवमी उत्साहात केल्याच्या नोंदी आहेत. राणीबाई यांच्या मृत्यूनंतर संस्थान जत संस्थानमध्ये विलीन करण्यात आले. गाडवे या मंदिराचे सध्या पुजारी आहेत. ते दररोज पूजा करतात. श्रीराम मंदिराची रचना काळ्या पाषाणात आहे. आयताकार दगडी चौथऱ्यावर चौरस गाभारा आहे. प्रवेशद्वार पूर्वेस आहे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ व समोर प्रवेशमंडपासाठी जागा सोडली आहे. चारही दिशांना भिंती काटकोनी पद्धतीने असून गाभाऱ्यावर शिखर नाही.

उत्तरेला गर्भगृहातून देवपूजा वा अभिषेकाचे पाणी बाहेर पडण्यासाठी गोमुख शिल्प आहे. गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी दगडी पायऱ्या चढून जावे लागते. मंदिराच्या वरच्या चारही दिशेला वानरशिल्प कोरलेले असून पूर्वेस प्रवेशद्वाराजवळ डाव्या व उजव्या बाजूस प्राण्यांची शिल्पे आहेत. आतून पाहिले असता छत घुमटाकार दिसते. बाहेरून सपाट दिसते.

धनुर्धारी रुपातील श्रीराम मूर्ती आहे. उजवीकडे माता सीता व डावीकडे लक्ष्मण आहेत. लक्ष्मणाच्या डाव्या अंगाला रामभक्त श्री हनुमान मूर्ती आहे. सर्व मूर्ती या दगडी चौथऱ्यावर बसवल्या आहेत. मूर्ती शास्त्राप्रमाणे परिपूर्ण मूर्तिमंत असून क्षत्रिय शरीराचे प्रदर्शन करणारी प्रभू श्री रामाची मूर्ती विलोभनीय आहे. मूर्तीवरील कोरीव काम लक्ष वेधून घेणारे आहे.

(साभार-दैनिक सकाळ)

Tuesday, August 22, 2023

अचकनहळ्ळीचे ऐतिहासिक बिसल सिद्धेश्वर मंदिर


पाचशे वर्षांपूर्वी डोण परिसरात वसलेले; निगडी खुर्द व अचकनहळ्ळी गावांच्या सीमेवरील स्थान तालुक्‍यातील अचनकहळ्ळी हद्दीतील व सुप्रसिद्ध काळ्या मातीच्या डोण परिसरात महान तपस्वी व योगी संत श्री सिद्धेश्‍वर महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे. पाचशे वर्षांपूवी आदिलशाहने मंदिराची निर्मिती केली असून, संपूर्ण बहामनी कालीन वास्तुशिल्पकलेतून उभारणी झाली आहे. त्या मंदिरास बिसल सिद्धेश्‍वर असेही म्हटले जाते. 

जत तालुक्यासह बाहेरील भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. श्रावणात दररोज सकाळी ६.१५ ला आरती केली जाते. श्रावण सोमवारी 'लाखो भाविक दर्शनास येत असतात व शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून या देवस्थानकडे पाहिले जाते. 

हे मंदिर जत शहराच्या उत्तरेस चार किलोमीटर अंतरावर आहे. जत ते निगडी दरम्यान काळ्या मातीचे मोठे डोण आहे. डोण परिसरात कुठेही लोकवस्ती वसविता येत नाही. सर्व मातीचा परिसर असल्याने जमिनीत बांधकामासाठी पाया लागत नाही. त्यामुळे परिसरात साधे घरही बांधता येत नाही. असे असले तरी पाचशे वर्षांपूर्वी परिसरात बिसल सिद्धेश्व रांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मुचंडी येथील दरेश्वर व बिसल सिद्धेश्वर या दोन मंदिरांची रचना समान आहे. मंदिराभोवती भव्य तटबंदी आहे. समोर भव्य कमान आहे. मुख्य कमानीच्या आत दोन उंच मीनार आहेत. मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग आहे. सकाळी सूर्य उगवताना मुख्य कमान ,दोन्ही मीनार व नंदीच्या छत्रीच्या माध्यमातून थेट पिंडीवर सूर्यकिरणे पडतात. कन्नड मध्ये उन्हाला'बिसल 'म्हणतात. म्हणून या मंदिरास 'बिसल सिद्धेश्वर' असे नाव पडले आहे. 

जत, निगडी खुर्द व अचकनहळ्ळी या तीन गावांच्या सीमेवर सिद्धेश्वर स्वामी यांनी घोर तपस्या केली. याच ठिकाणी त्यांनी देह ठेवला. त्या ठिकाणावर विजापूरच्या आदिलशाहने भव्य मंदिर उभारले. प्रतिवर्षी श्रावणातील शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते. लाखो भाविक दर्शनाला येतात. प्रत्येक सोमवारी दर्शनास गर्दी असते. मंदिराच्या विकासासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नांतून आणि पुढाकाराने जिल्हा नियोजन मधून एक कोटी रुपयांपर्यंत निधी खर्च करून सभागृह, भक्तनिवास, रस्ता, पेव्हिंग ब्लॉक्स, स्वतंत्र ट्रांसफार्मर असा विकास करण्यात आला आहे.


Saturday, April 8, 2023

इतिहाससमृद्ध गाव बेवनूर

जत तालुक्याच्या उत्तर भागात बेवनूर हे गाव आहे. या गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शिंदे, देवकर आणि सरगर ही तीन ऐतिहासिक घराणी गावात आहेत. या घराण्यांसंबंधी वाडे, समाध्या, बारव व अन्य वास्तू अवशेष रूपात येथे आहेत. बेवनूर गावच्या इतिहासासंबंधी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे गेली काही वर्षे अभ्यास करीत आहेत. या अभ्यासादरम्यान त्यांना गावात विखुरलेले अवशेष आढळून आले.

समाधीस्थळे

जुन्या महादेव मंदिरासमोर उंच चौथऱ्यावर एक छोटी मंदिरवजा समाधी आहे. चुन्याच्या सहाय्याने दगडात बांधलेली आणि वर चुना-विटाचे शिखर असलेली ही समाधी प्रथमदर्शनी मंदिरच भासते. या समाधी मध्ये लहानसे शिवलिंग आहे. समाधीच्या चौथऱ्यावर पुष्पदल कोरले आहे. समाधीच्या चौकटीच्यावर दगडात कोरलेला लेख असून शिंदे- पाटील यांनी शके १७६० म्हणजे इसवी सन १८३८मध्येही समाधी बांधल्याचे म्हटले आहे. गावातील शिंदे घराण्याची ही समाधी असून तेथे समाधी खाली असलेल्या देवळीमध्ये या घराण्यातील मृत व्यक्तिच्या अस्थि आजही ठेवल्या जातात. 

सतीशिळा

महादेव मंदिरासमोरच सतीचे समाधी मंदिर उंच चौथऱ्यावर आहे. या सतीसमाधीच्या चौथऱ्याला टेकून सती निदर्शक हात असलेली दगडी शिळा ठेवली आहे. अशीच आणखी एक सतीशिळा काही दिवसांपूर्वी काटेरी झुडुपात काही विद्यार्थ्यना आढळून आली होती. ती जतन करून ठेवण्यात आली आहे.

ऐतिहासिक वाडे

गावात शिंदे, सरगर आणि देवकर या घराण्याचे वाडे आहेत. त्यांची बरीच पडझड झाली आहे. या वाड्यांपैकी काहींच्या भिंतीच्या दगडावर हत्ती, घोडा, मोर, सुर्य-चंद्र, फुलांची नक्षी व अन्य भौमितिक आकृत्या कोरल्या आहेत. तर काही दगडांवर नावे लिहीली आहेत. काही वाडयात धान्य साठविण्याच्या अंबाऱ्या आहेत. शंभर-दीडशे वर्षांपूर्वीचे हे वाडे आहेत. त्यांची आता बरीच पडझड झाली आहे.

ऐतिहासिक पारकट्टा

गावात मध्यभागी सध्याच्या ग्रामपंचायती समोर ऐतिहासिक पारकट्टा आहे. त्यावर दोन्ही बाजुला सन १९४० हे इंग्रजी व मराठी मध्ये लिहिले आहे. मध्यभागी श्री शिवाजीराव असे नाव लिहिले आहे.

ऐतिहासिक बारव

गावंदरीलगत शिंदे घराण्याच्या समाईक जागेत सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची कमानी युक्त बारव आहे. सहा मोटांच्या या बारवेत उतरण्यासाठी अर्धचक्राकार पायऱ्या आहेत. सध्या या बारवेची पडझड सुरू आहे.

म्हसोबा मंदिर

गावाबाहेर दोन ओढ्यांच्या काठावर भव्य आवारात वसलेले म्हसोबा मंदिर आहे. मंदिराला घाटवजा पायऱ्या आहेत. मंदिराजवळच चुन्याची घाणी व दगडी चाक आहे. दरवर्षी येथे गुढीपाडव्यानंतर मोठी यात्रा भरते. यावेळी मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचा बळी दिला जातो.

दीर्घ लष्करी परंपरा

गावाला मोठी सैन्य परंपरा आहे. दुसरे महायुद्ध आणि आझाद हिंद फौजेत येथील जवान सहभागी होते. सन १९६५, १९७१, बांगलादेश आघाडी, सुवर्णमंदिर ऑपरेशन, श्रीलंका शांतिसेना, कारगील अशा विविध समर प्रसंगात येथील जवानांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या कामगिरी बद्द्ल येथील जवानांना जंगी इनाम दाखल जमिनीही मिळाल्या आहेत. सध्या गावात आजी माजी सैनिक मिळून सुमारे शंभर जवान आहेत.

शिखर शिंगणापूरची कावड 

येथील शिंदे घराण्याचे कुलदैवत खरसुंडीचा सिद्ध नाथ आहे. मात्र, येथून शिंदे घराण्यातील लोक शिखर शिंगणापूरला कावड अनेक वर्षे नेतात. तांबे धातुच्या या कावडीही ऐतिहासिक आहेत.  समृध्द इतिहास असलेल्या या गावात अन्य काही ऐतिहासिक अवशेष विखुरलेले दिसतात. - मानसिंगराव कुमठेकर, प्रा. गौतम काटकर

Monday, February 27, 2023

उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी स्वखर्चाने उभारले तब्बल पंधरा कोटींचे बुद्ध विहार


सांगली जिल्ह्यातील गुगवाड (ता. जत) येथील उद्योजक  आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सी.आर. सांगलीकर यांनी स्वखर्चाने जतसारख्या दुष्काळी भागात भव्य असे देखणे 'धम्मभूमी' बुद्धविहार उभारले आहे. यासाठी तब्बल पंधरा कोटी खर्च आला आहे. रोज शेकडो लोक ते पाहण्यासाठी येत असतात. श्री. सांगलीकर यांना आळंदी (पुणे) येथे अनाथपिंडक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  

 सांगली जिल्ह्यातील उद्योजक सी.आर. सांगलीकर यांनी सांगली जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावी गुगवाड येथे स्वतः च्या तब्बल वीस एकर जागेत तब्बल पंधरा कोटींचे देखणे प्रशस्त, स्वखर्चाने "धम्मभूमी"  बुद्ध विहार उभारले आहे. गेल्या 12 नोव्हेंबर 2022 रोजी या "धम्मभूमी" चा लोकार्पण सोहळा पार पडला. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांतील अंदाजे दोन लाख धम्मबांधवांच्या उपस्थितीत होते. सांगलीकर यांच्या तन, मन,धनाने करत असलेल्या प्रामाणिक धम्म कार्याचा गौरव म्हणून बुद्ध विहार समन्वय समितीने अनाथपिंडक हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. 


         

Wednesday, April 21, 2021

जत तालुक्याची काही खास वैशिष्ट्ये

 जत तालुक्याला रामायण महाभारत काळापासून संदर्भ आहेत.

1) भीमाने वध केलेल्या बंकासूराचे जतमध्ये प्राचीन मंदिर आहे.  बंकेश्वर नावाचे जगातील हे एकमेव मंदीर आहे. 

2) काळवेदन राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने मुचकंदेश्वर ॠषींच्या आश्रमात आश्रय घेतला होता.  ते मुनीवर जत तालुक्यातील मुचंडी येथे वास्तवास होते. त्यांच्या नावावरून गावाचे नाव मुचंडी पडले आहे. 

3) महर्षी वाल्मिकी यांनी ध्यान साधना केलेली गुफा कोळगिरी डोंगरात आहे.  त्याला जोगीहरी म्हणून ओळखले जाते.  वाल्या कोळी यांचे वास्तव्य होते म्हणून गावाचे नाव कोळगिरी पडले आहे. 

4) श्री दत्त महाराज यांनी होम केलेल्या कुंडापैकी तिसरा कुंड जत तालुक्यातील तिकुंडी येथे आहे.  त्यामुळे गावाचे नाव तिकुंडी पडले आहे. 

5) महात्मा बसवेश्वर यांच्या शरण दलाच्या सेनापती,  हजार वर्षापूर्वी सामुहिक विवाह पध्दती सुरू करणाऱ्या देवी दानम्मा यांचा जन्म जत तालुक्यात उमराणी येथे  झाला. गुड्डापूर हे त्यांचे सासर.  सध्या ते लिंगायत धर्माचे तिर्थक्षेत्र आहे. 

6) हिंचगीरी सांप्रदायाचे संस्थापक भाऊसाहेब महाराज जत तालुक्यातील उमदीचे. 

7) संत गाडगे बाबा महाराज यांचे शिष्य सद्गुरू बागडे बाबा जत तालुक्यातील गोंधळेवाडीचे

8) छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती प्रतापराव गुजर व आदीलशाही सेनापती अब्दुल करिम बहलोल खान यांच्यातील जगप्रसिद्ध युध्द जत तालुक्यातील  उमराणी येथे झाले. 

9) कर्नाटक व महाराष्ट्र सीमावर्ती भागातील राॅबीनहूड,  क्रांतीसूर्य सिंदूर लक्ष्मण जत तालुक्यातील सिंदूरचे .

10) सांगली-सोलापूर-विजापूर अशा तीन जिल्ह्यातील पाच परगण्यात 350 वर्षे राज्य करणारे डफळे संस्थान जतचेच. 

11) स्वतंत्र सांगली जिल्ह्याचे पहिले खासदार जतचे श्रीमंत विजयसिंह राजे  हे होते. 

12) श्रीमंत विजयसिंह राजे हे महाराष्ट्र रणजी संघाचे कर्णधार होते. गोलमेज परिषदेस उपस्थित राहणारे ते जिल्ह्यातील एकमेव होते. 

13) जिल्ह्यातील पहिले विमान व विमानतळ जतला होते. 

14) जत तालुक्यात 4 भुईकोट किल्ले व एक डोंगरी दूर्ग, तसेच विसहून अधिक गढ्या आहेत. 

15)  जत तालुक्यात एक हजार वर्षापूर्वीचे पंधराहून अधिक शिलालेख आहेत. 

16) जत तालुक्यात दोन हजार वर्षापूर्वीची 17 हेमाडपंथी मंदीरे आहेत. 

17) जतच्या यल्लमादेवीची यात्रा जगप्रसिद्ध आहे.

18) माजी राष्ट्रपती बी. डी .जत्ती हे मूळचे जत तालुक्यातील.  त्यामुळे त्यांचे आडनाव जत्ती पडले.

19) जत हा गवताळ प्रदेश असून हरिण,  तरस,  लांडगे,  खवले मांजर, वोंबाट, दुर्मिळ घुबड,   म्हांडूळ, घोणस, नागसाप, अजगर  असे अनेक दुर्मिळ वन्यजीव जत तालुक्यात आजही आढळून येतात. 

माडग्याळी मेंढी, बोरे,  व्हसपेठचे जेन,  वाळेखिंडी,  सिंदूर पेढे, हळद, डाळींब ही जतची खासियत आहे. 

संदर्भ- " वैभवशाली जत " हे पुस्तक. 

लेखक: श्री दिनराज वाघमारे

Wednesday, March 17, 2021

जतच्या प्राचीन आणि ऐतिहासिक परंपरेचे अधिक संशोधन व्हावे


जतला प्राचीन आणि ऐतिहासिक अशी मोठी परंपरा आहे, याचा पुरावा अलिकडच्या काळात सापडलेल्या विविध ठिकाणच्या शिलालेखावरून आढळून येत आहे. रामायण आणि महाभारत काळात हा परिसर सर्व प्रदेश समृद्ध होताच शिवाय राम,सीता आणि लक्ष्मण यांच्याबरोबरच महाभारतातील प्रमुख व्यक्तींचा पावनस्पर्श या भूमीला लागला आहे. या भागात आणखी संशोधन व्हावे, अशी अपेक्षा केली जात आहे. शिवाय सापडलेल्या शिलालेखांचे संग्राहलय उभे करण्यात यावे आणि जतच्या ऐतिहासिक आणि पौराणिक इतिहासाचा या माध्यमातून परिचय करून देण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे.

परवाच जतजवळ असलेल्या मल्लाळ गावात शेतात नांगरणी करताना एका शेतकऱ्याला 900 वर्षांपूर्वीचा शिलालेख आढळून आला आहे. यापूर्वी वज्रवाड, बालगाव, कुडणूर परिसरात शिलालेख आढळून आले आहेत. दुष्काळी आणि मागास अशा  जत तालुक्याला  अतिशय प्रगल्भ असा इतिहास लाभला आहे. जत तालुक्यामध्ये सापडणारे शिलालेख या इतिहासाच्या वैभवामध्ये भरच टाकत आहेत.

जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, शिलालेख आढळून येत आहेत. तालुक्यातील मल्लाळ याठिकाणी दीपक माने या इसमाची डोंगरावर जमीन आहे. याठिकाणी नांगरणी करत असताना चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकीर्दीतील शिलालेख सापडला आहे.सन 1120 मध्ये एका शिवमंदिरासाठी जतचा प्रमुख दंडनायक बंकेय याने मल्लाळ येथील दहा मत्तर (जमीन आकार ) जमीन दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. या शिलालेखातून चालूक्यसम्राट विक्रमादित्य याच्या कारकीर्दीतील नवी माहिती उजेडात आली आहे. गेल्या सहा महिन्यात नऊशे ते हजार वर्षांपूर्वीचे हे चार शिलालेख मिरज संशोधन मंडळामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात समोर आले आहेत. या तालुक्याच्या विविध गावात चालुक्य, कलचुरी, यादवकालीन यांच्या राजवटीतील शिलालेख आढळून आले आहेत. मल्लाळ हे गाव जतपासून सुमारे चार किलोमीटरवर आहे. या गावच्या दक्षिणेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोंगरावर खडकाळ जमीन आहे. यापैकी दीपक माने यांची जमीन नांगरत असताना भगवान काळे या व्यक्तीला मोठा दगड आढळून आला. या दगडावर शिवलिंग, गाय-वासरू, कट्यार, सुर्य चंद्राचे शिल्पांकन होते. खालील बाजूस हळे कन्नड लिपीतील मजकूर आहे. याबद्दल येथील रहिवासी मारूती ओलेकर आणि ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण ओलेकर यांनी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांना दिली. त्यांनी याठिकाणी जाऊन शिलालेखाचे ठसे घेऊन त्याचा अभ्यास केला असता या शिलालेखात एकूण 13 ओळी आहेत. या शिलालेखाचे वाचन हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे शिलालेखशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कलवीर मनवाचार यांनी करून दिले असून, या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्य याचा उल्लेख आला आहे.

चालुक्य विक्रमादित्य हा महापराक्रमी राजा होता. त्याने 50 वर्षे राज्य केले आहे. त्याच्या काळात चालुक्य राज्याच्या सीमा गुजरातपासून दक्षिणेत तामीळनाडू पर्यंत भिडल्या होत्या. त्याच्या काळात कला, विद्या यांचा मोठा विकास झाला. चालुक्य सम्राट विक्रमादित्य हा इसवी सन 1076 मध्ये गादीवर आला. त्याने आपल्या राज्यारोहणानिमित्त स्वतःच्या नावाचा चालुक्य विक्रम शक सुरू केला. पश्चिम महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या चालुक्य सम्राट विक्रमादित्याच्या काळात अनेक मंदिरे बांधली गेली होती . त्या मंदिरांसाठी जमीनी दान देण्यात आल्या होत्या, त्यासंबंधी अनेक शिलालेख उपलब्ध आहेत. मल्लाळ येथे सापडलेला हा शिलालेख सांगली जिल्ह्यात विक्रमादित्याचा सापडलेला कालदृष्ट्या पहिला शिलालेख आहे.

या शिलालेखात काय आहे

मल्लाळ येथे सापडलेल्या या शिलालेखात चालुक्य विक्रम शक 45 शार्वरीनामसंवत्सरे, भाद्रपद शुद्ध पंचमी सोमवार या दिवशी जत येथील प्रमुख दंडनायक बंकेय याने शिव मंदिरासाठी 10 मत्तर जमीन दान दिल्याचा उल्लेख या लेखात आहे. हा लेख 1 ऑगस्ट सन 1120 रोजी लिहिला गेला आहे. या लेखात उल्लेख केलेला जतचा प्रमुख बंकेय याने जतमध्ये बांधलेल्या शिवमंदिराला बंकेश्वर या नावाने ओळखले जाते. जत आणि परिसरात या दंडनायकाचे प्रभुत्व असल्याचे या शिलालेखावरून दिसते. या शिलालेखात त्याच्या विशेषणांचा उल्लेख करण्यात आला आहे. जत तालुक्यातील अभ्यासक, संशोधक, राजकीय, तसेच विविध स्तरावरील लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन जतचा इतिहास जगासमोर आणायला हवा. जतचे ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे यांनी  जतचा वैभवशाली इतिहास पुस्तकरूपाने लिहिला आहे. आता ते प्राचीन आणि स्थळांची माहिती आणि छायाचित्रे युट्युबच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणत आहेत.

आजपर्यंत जत तालुक्यात मध्ये सापडलेले शिलालेख

1) वज्रवाड- येथे साडेसहाशे वर्षांपूर्वीचा हळेकन्नड लिपीतील शिलालेख सापडला आहे. 1371 मध्ये सिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याच्या पूजा नैवेद्यासाठी जमिनी दान दिल्याचा यावर उल्लेख आहे.

वज्रवाड शिलालेख-2) जत तालुक्यातील कर्नाटक सीमेजवळ बालगाव नऊशे वर्षापूर्वी शिलालेख आहे. हा 1136 मधील शिलालेख असून यावर चालुक्य राजा तिसरा सोमेश्वर उर्फ भूलोकमल्ल यांच्या कारकिर्दीतील त्यांच्या मांडलिक बीज्जल कलचुरी दिलेला दानलेख यावर आहे.

बालगाव शिलालेख- 3) जत आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्याच्या सीमेवर असलेलं कुडनूर गावामध्ये यादवकालीन शिलालेख सापडलेला आहे. या शिलालेखात सिंगणापूर गावातील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या तीन देवांना जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. साधारणत: एक हजार पूर्वीचा हा शिलालेख आहे.

कुडनूर गावात सापडलेला शिलालेख- 4) मल्लाळ याठिकाणी सापडलेला चालुक्य सम्राट विक्रमादित्याचा शिलालेख

Thursday, March 4, 2021

कुडणूरला सापडला यादवकालीन शिलालेख


जत तालुक्यातील पश्चिम भागातील कुडणूर येथे यादवकालीन हळेकन्नड लिपीतील शिलालेख सापडला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गौतम काटकर, मानसिंग कुमठेकर यांना हा शिलालेख आढळून आला आहे. कुडणूरजवळ असलेल्या शिंगणापूर गावातील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या तीन देवांना जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. पाच वर्षांपासून या दोघांचे संशोधन सुरू आहे. हा शिलालेख मारुती मंदिराशेजारील रस्त्यावर भंगलेल्या अवस्थेत होता. तालुक्यात चालुक्य आणि यादवकालीन काही शिलालेख मिळाले आहेत. जत तालुक्याच्या एक हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश पडतो. जत आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर कुडणूर हे गाव आहे. कुडणूर येथील बाळासाहेब मासाळ, संतोष पांढरे, सतीश पांढरे, नायकू सुतार, सुभाष पांढरे यांनी एक शिलालेख गावात असल्याची माहिती प्रा.काटकर, कुमठेकर यांना पाच वर्षांपूर्वी दिली होती. शिलालेखाचे दोन भाग झाले होते. शिलालेखाच्या वरच्या बाजूला गाय, सूर्य-चंद्र, शस्त्र अशी चित्रे कोरली आहेत. या लेखाचा अभ्यास तज्ज्ञ लोकांकडून अभ्यास करून घेण्यात आला. त्याचे वाचन करून घेण्यात आले. यात नऊ ओळी आहेत. वरील बाजूस चार अस्पष्ट अक्षरे आहेत. सदर लेखात शिंगणापूर येथील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर  या तीन देवांना बागायत जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. या गावाशेजारी शिंगणापूर हे गाव आहे. या गावात असलेल्या महादेवाच्या तीन स्थानांचा उल्लेख या लेखात आहे. मात्र सध्या अशा नावाची कोणतीही मंदिरे या दोन्ही गावात नाहीत. अक्षरांच्या वळणावरून आणि लिपिवरून हा लेख उत्तर यादव काळातील असावा असाही अंदाज आहे. या लेखात सिंघणेश्वर असा उल्लेख केला आहे. कदाचित तो यादव राजा सिंघण याच्या नावावरून स्थापन केलेल्या मंदिराचा असावा. जत तालुक्यात सिंगणहळळी आणि शिंगणापूर अशी गावांची नावे आढळतात. तीही यादवराजा सिंघण याच्या नावावरूनच असावीत.

ओढयांच्या संगमावर

कुडणूर हे गाव ओढ्याच्या संगमावर वसले आहे. पूर्वी ते तेथून थोड्या अंतरावर होते. त्याला पांढरीचे रान म्हणतात. याच गावाजवळ शिंगणापूरलगत संबंधित तीन मंदिरांना जमीन दिली असल्याने सदरचा शिलालेख कुडणूर गावाच्या हद्दीत आला असावा, असेही संशोधक कुमठेकर यांनी सांगितले.

Friday, February 12, 2021

बालगांवमध्ये सापडला चालुक्यकालीन शिलालेख


जत तालुक्यातील बालगांव येथे चालुक्यराजा तिसरा सोमेश्वर उर्फ भूलोकमल्ल याच्या कारकिर्दीतील त्याचा मांडलिक बिज्जल कलचुरी याने दिलेला दानलेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर यांनी शोधून काढला आहे. सन 1137 मधील हा लेख असून, यामध्ये बालगांव येथील कळमेश्वर स्वामी यांना दान दिल्याचे म्हटले आहे. सुमारे 884 वर्षांपूर्वीच्या या लेखातून सांगली जिह्याच्या तत्कालीन राजकीय व धार्मिक इतिहासावर प्रकाश पडणार आहे.

बालगांव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेले सांगली जिह्यातील शेवटचे गांव आहे. पंढरपूर-विजापूर महामार्गावर वसलेल्या या गावाला प्राचीन इतिहास आहे. येथील अल्लमप्रभूचे देवस्थान हे महाराष्ट्र-कर्नाटकातील भाविकात प्रसिध्द आहे. याच बालगांवमध्ये मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे संशोधन करीत असताना त्यांना अल्लमप्रभू देवस्थानालगत हळेकन्नड लिपितील एक शिलालेख आढळून आला. तो भग्नावस्थेत होता. त्याच्या वरच्या भागातील 13 ओळीच फक्त शिल्लक राहिल्या आहेत. या शिलालेखावर सुर्य-चंद्र, शिवलिंग, गाय-वासरू, कटय़ार अशी चिन्हे कोरली आहेत. हा शिलालेख पूर्वी मारुतीच्या देवळात होता. शिलालेख अभ्यासासाठी सागर कांबळे, डॉ. महेंद्र बोलकोटगी (जमगी), प्रभाकर सलगर (बालगाव), मधू पाटील (बालगाव) यांची मदत झाली.
  या लेखात बालगांवमधील कळमेश्वर स्वामींना बिज्जल कलचुरी राजाने सुर्यग्रहणाच्या दिवशी दान दिल्याचा उल्लेख आहे. या लेखाच्या प्रारंभी कलचुरी राजा बिज्जल याच्या बिरुदावल्या आल्या आहेत.* कलचुरी राजांमध्ये बिज्जल कलचुरी हा पराक्रमी राजा होता. चालुक्यराजा दुसरा जगदेकमल्ल आणि भूलोकमल्ल याचा तो मांडलिक होता. त्याने महामंडलेश्वर ही पदवी चालुक्य राजांकडून प्राफ्त करुन घेतली होती. त्याला पंचमहाशब्दांचा मान मिळाला होता. तसेच शंख, भेरी, मृदंग, श्रृंग व घंटा ही वाद्ये वाजविण्याचा सन्मान मिळाला होता. तसेच आगमन आणि गमनप्रसंगी त्याचे स्वागत डमरुग आणि तुर्य ही वाद्ये वाजवून करण्याचाही मान त्याला होता.
बालगांवमधील लेखात तो मंगळवेढे येथून राज्य करीत असल्याचा उल्लेख आहे. या लेखात त्याला लावलेल्या विशेषणांमध्ये युध्दात शत्रूला अत्यंत घनघोर वाटणारा, शूरवीरांचा सूर्य, कलिकालाच्या गळ्यावर रोखलेला अंकुश, शत्रूरुपी हत्तींचा नाश करणारा सिंह, निर्भयपणे पराक्रम गाजविणारा वीर आणि परनारी सहोदर म्हणजे परस्त्रीचा बंधू यांचा समावेश आहे. त्याने बालगांवमधील एका स्वामींना पिंगळनाम संवत्सराच्या वर्षी सोमवार असताना कार्तिक महिन्यात दान दिल्याचे म्हटले आहे. यावेळी चालुक्यराजा भूलोकमल्ल तथा तिसरा सोमेश्वर याच्या राज्यारोहणाचे 13 वे वर्ष सुरू होते. बिज्जल कलचुरीचा हा जिह्यात सापडलेला कालदृष्टय़ा पहिला शिलालेख आहे. बिज्जल कलचुरी हा चालुक्यांचा नातेवाईक होता. चालुक्यराजा सहावा विक्रमादित्याची पत्नी चंदलदेवी ही बिज्जलाची आजी होती. बिज्जल राजा हा पराक्रमी होता. प्रारंभी तो चालुक्यांचा मांडलिक असला तरी त्याने 1156 मध्ये चालुक्याचे मांडलिकत्त्व झुगारुन देऊन सध्याच्या सांगली, सातारा, सोलापूर या भूभागावर आपली सत्ता प्रस्थापित केली.
मिरज इतिहास संशोधक मंडळाच्या अभ्यासकांना बालगांव येथे सापडलेल्या या नव्या शिलालेखामुळे सांगली जिह्यातील सुमारे 884 वर्षांपूर्वीच्या राजकीय आणि धार्मिक इतिहासावर प्रकाश पडणार आहे.
बिज्जल कलचुरी याच्या ताब्यात सध्याच्या सांगली जिह्याचा बहुतांशी भाग होता. त्यामुळे जिह्याच्या विविध भागात त्याचे शिलालेख आजवर आढळून आले आहेत. यामध्ये देशिंग-बोरगांव, भाळवणी, वळसंग याठिकाणी त्याच्या कारकिर्दीतील शिलालेख सापडले आहेत. या शिलालेखांमधून कल्याणीचे चालुक्य राजे आणि त्यांचे मांडलिक असलेल्या कलचुरी राजसत्तांची माहिती मिळते. कालदृष्ट्या कलचुरीचा पहिला शिलालेख आहे. बिज्जल कलचुरीचा हा जिल्ह्यात सापडलेला कालदृष्ट्या पहिला शिलालेख आहे. तो चालुक्यांचा नातेवाईक होता. चालुक्यराजा सहावा विक्रमादित्याची पत्नी चंदलदेवी ही बिज्जलाची आजी होती. बिज्जल राजा हा पराक्रमी होता. प्रारंभी तो चालुक्यांचा मांडलिक असला तरी त्याने ११५६मध्ये चालुक्याचे मांडलिकत्व झुगारून सध्याच्या सांगली, सातारा, सोलापूर या भूभागावर सत्ता प्रस्थापित केली.दरम्यान, आपल्या भागात असे शिलालेख असल्यास संपर्क साधावा आवाहन मानसिंगराव कुमठेकर 9405066065, व प्रा. गौतम काटकर 9881550706) यांनी जतवासियांना केले आहे.

Tuesday, December 15, 2020

बुद्धिबळातील 'लिटल चॅम्प' : श्रेया हिप्परगी

जागतिक बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड


सध्या पाचवीच्या वर्गात शिकत असलेली श्रेया हिप्परगी बुद्धीबळ स्पर्धांमध्ये  चमकदार कामगिरी करत आहे. वडिलांची मदत, मोबाईल आणि संगणक हेच बुद्धिबळाच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे साधन असलेल्या श्रेयाने जतसारख्या ग्रामीण भागाचे नाव जगाच्या नकाशावर नेले आहे. संख येथील राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशालेत शिकत असलेल्या श्रेयाची १९ डिसेंबरपासून सुरू  होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या दहा वर्षांखालील आशियाई बुद्धिबळ  स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्यामुळे तिची निवड झाली. गेल्या काही वर्षात अनेक स्पर्धातून  पारितोषिके पटकावली आहे. नुकतेच ११ ते १३ डिसेंबर अखेर आंतरराष्ट्रीय आशियाई बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन स्पर्धा झाली. त्यामध्ये दहा वर्षाखालील  मुलींच्या गटात सातपैकी सहा फेऱ्या  जिंकून श्रेया हिने द्वितीय क्रमांक  पटकावला. स्पर्धेत आशिया खंडातील  २० देशातील खेळाडू सहभागी झाले होते. तिने द्वितीय क्रमांक पटकावून देशाची मान उंचावली. तिच्या निवडीमुळे सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्रेया सध्या नागपूरचे आंतरराष्ट्रीयमास्टर अनुप देशमुख यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे. 

जत तालुक्यातील सिंदूर येथील गुरू हिप्परगी सध्या संख येथे माध्यमिक शिक्षक आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेताना बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. याच खेळाची गोडी मुलगी श्रेयालाही लागावी यासाठी त्यांनी तिला वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळाच्या खेळाचे प्राथमिक धडे देणे सुरू केले. तिला या खेळाची प्रचंड गोडी लागली. त्यानंतर दोन वर्षांत प्रत्येक स्पर्धेत तिने सहभाग घेत यश मिळवले. काही वर्षांपूर्वी सांगली येथे झालेल्या  जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहा प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत तिने प्रथम, तर राज्य बुद्धिबळ संघामार्फत मुंबईत झालेल्या ७ वर्षे वयोगटातील स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत राज्यातील ७० स्पर्धकांनी भाग घेतला होता. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ७ वर्षे वयोगटाखालील एकूण १२५ स्पर्धकांमध्ये श्रेया दुसरी आली. थायलंडमध्ये १ ते १० एप्रिल या कालावधित झालेल्या ८ वर्षाखालील स्पर्धेत आशिया खंडातील ६० स्पर्धकांमधून श्रेयाने रौप्य व कास्यपदकाची कमाई केली.

थायलंड येथील स्पर्धेसाठी तिला शासनाकडून आर्थिक मदत मिळाली होती. तिच्या कुटुंबियांनी तर दीड लाख रुपये खर्च केले होते.  स्पेन येथे झालेल्या स्पर्धेतही तिने यश मिळवले होते.  संगणक, मोबाईलवर विश्वनाथन आनंद, गॅरी कास्पोरोव यांसारख्या जागतिक दर्जाच्या बुद्धिबळपटूंच्या खेळातील चालीचा अभ्यास ती करीत आहे.

आशियाई स्पर्धेतील कामगिरीमुळे तिची १९ डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या  जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड  झाली आहे. त्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे. तिला संस्थेचे संस्थापक बसवराज पाटील,  संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील,  शाळेचे मुख्याध्यापक श्री. कनूर, ए. एस. बिराजदार, दिपक वायचळ मार्गदर्शन लाभत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Friday, November 27, 2020

महात्मा बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी


जत तालुक्याला प्राचीन आणि ऐतिहासिक इतिहास आहे. रामायण आणि महाभारत याचबरोबर शिलाहार, कलचुरी, देवगिरीचे यादव, मोगल, विजापूरची आदिलशाही आणि शिवशाही अशा सर्व राजवटींच्या काळात जत तालुक्याला महत्त्व होते. सांगली जिल्ह्याच्या एका पूर्व टोकाला असलेल्या आणि आकाराने विस्तीर्ण असलेल्या जत तालुक्यात प्राचीन काळापासून इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. तालुक्याचे ठिकाण असलेले जत शहर(जयंत नगरी), संख, उमदी, उमराणी(प्राचीनकाळी उंबरवनी), माडग्याळ (प्राचीन नांव माडगीहाळ), सिंगनहळ्ळी, लोणार,डफळापूर ही व अन्य अनेक गांवे प्राचीन आहेत. सुमारे साडेसातशे वर्षापूर्वी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या इतिहासात पराक्रमाचा ठसा उमटविणारे देवगिरीचे राजे सिंघनदेव आणि संकमदेव यादव या तालुक्यात येऊन गेलेले आहेत.त्यांच्या नांवाने ओळखली जाणारी सिंघनहळ्ळी व संख अशी गांवे आजही या तालुक्यात आहेत.विशेष म्हणजे सिंघनहळ्ळी या लोणारीबहूल गावात लोणारी समाजाची लोकसंख्या ९०%च्या आसपास आहे.तर संख व परिसरातील गोंधळेवाडी, सोरडी, आसंगी, जाल्याळ, दरिबडची, माणिकनाळ, खंदनाळ या गावात लोणारी समाजाची लोकसंख्या दखलपात्र आहे.तर सिंघनहळ्ळी या ऐतिहासिक गावाच्या शेजारी लोणारवाडी (वाळेखिंडी), काशिलिंगवाडी, बागलवाडी ही अशीच लोणारीबहूल गावे आहेत.जत ही महात्मा बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमि आहे. म्हणून जत तालुक्यात हिंदू लोणारी बरोबर लिंगायत-लोणारी समाजाची संख्याही लक्षणीय आहे.

खुद्द जतमध्ये श्रीबंकेश्वर,माडग्याळमधील श्री महादेव आणि उमराणीतील हेमलिंगेश्वर ही मंदिरे अतिप्राचीन असून तीनही ठिकाणी प्राचीन हळेकन्नड किंवा कन्नड भाषेतील शिलालेख आहेत. अलीकडेच गुगवाड येथेही एक कन्नड शिलालेख आढळून आले आहे.त्यावरून जत तालुक्याच्या इतिहासावर प्रकाश पडतो.छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा पराक्रम या तालुक्याने पाहिलेला आहे.विजापूरच्या आदिलशाहाचा सरदार बहलोलखान याच्या चतुरंग सैन्याचा प्रतापराव गुजर यांनी उमराणीजवळ पराभव केला आणि बहलोल खान शरण आला. जतच्या डफळे घराण्याशी सुमारे चारशे वर्षाच्या पराक्रमाचा इतिहास जोडलेला आहे.राजस्थानमधील पराक्रमी दुधात हाडा चौहान राजपूत वंशाबरोबर जतच्या डफळे घराण्याचा इतिहास निगडित आहे.डफळे घराण्याला  सर्जनसिंह, शामलसिंह, शार्दूलसिंह, सटवाजी अशा पराक्रमी पुरुषांची परंपरा या घराण्याला आहे.

उमराणीचे डफळे म्हणजे जतच्या डफळे राजघराण्याची एक स्वतंत्र गादी आहे.डफळे घराण्याचे संस्थापक श्रीमंत सटवाजीराजे यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांचे पुत्र बाबाजीराजे व खानाजीराजे यांचे निधन झाले होते.श्रीमंत सटवाजीराजे यांच्या सुनबाई राणी येसूबाई यांनी १७०७ ते १७३८ सालापर्यंत डफळे संस्थानाचा राज्यकारभार एकहाती सांभाळला. १७३८ साली राणी येसूबाई यांनी आपले सावत्रदीर खानाजीराव यांच्या चारही मुलांना दत्तक घेतले.दत्तकानंतर यशवंतराव, रामराव,भगवंतराव व मुकुंदराव हे डफळे संस्थानाचे वारस झाले.या चारही मुलांना राणी येसूबाई यांनी आपली जहागिरी वाटून दिली.थोरले यशवंतराव यांना जत,दुसरे रामराव यांना डफळापूर,तिसरे भगवंतराव यांना उमराणी तर सर्वात लहान असलेले मुकुंदराव यांना सध्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात असलेल्या हुलजंतीची जहागिरी दिली.

पूर्वीच्या जत संस्थानातील पण नंतरच्या हुलजंती संस्थानातील अर्थात आताच्या मंगळवेढा तालुक्यातील "लोणार"या गांवात प्राचीनकाळी जमिनीतून मीठ काढण्याची पद्धत होती."लोणार"या गांवाचा तशा खनिज मिठासंदर्भात अभ्यासकांनी प्राचीन शिलालेखात उल्लेख केलेला असल्याची माहिती इतिहास अभ्यासक चिंतामणी सहस्रबुद्धे यांच्या "इतिहासाची सुवर्णपाने"या पुस्तकात केलेला आहे.माडगीहाळ किंवा मडीहाळ(आज माडग्याळ ता.जत)येथील महादेव मंदिरातील शिलालेखही (२७ जानेवारी ११७२,नंदन संवत्सर शके १०९३) प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकतो.या ठिकाणी माडग्याळचा मालिंगे असा उल्लेख आहे,याशिवाय वासुबिंगे(वासुंबे ता.तासगांव)लोणार ता.जत आणि कोळनूर या गांवाचा उल्लेख आहे.पण "लोणार"या पूर्वीच्या जत संस्थानातील गांवात १२ व्या शतकात खनिजमातीपासून मीठ काढले जात होते,असा शिलालेखात उल्लेख आहे.

Wednesday, October 28, 2020

वज्रवाड येथे 650 वर्षांपूर्वीचा शिलालेख


जत तालुक्यातील वज्रवाड येथे ओढ्याच्या काठावर बसवेश्वर मंदिर आहे. हे मंदिर ऐतिहासिक असून चालुक्यांच्या काळात बांधण्यात आले असावे,असे इतिहासकार सांगतात. हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून सभामंडप ,अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन भागात उभारलेले आहे. परंतु  जुना सभामंडप नष्ट झाला आहे तर अंतराळ आणि गाभारा शिल्लक आहे. अंतराळ भागात दगडी भिंतीवर हळे कन्नड भाषेतील एक शिलालेख कोरला आहे. 12 ओळींचा हा शिलालेख तीन टप्प्यात आहे. मात्र या लेखावर ऑईलपेंटने रंगवण्यात आल्याने तो अस्पष्ट झाला होता. हा ऑईलपेंट काढण्यात आल्यानंतर त्यावरील अक्षरे सुस्पष्ट दिसू लागली. सदर शिलालेखाचा अभ्यास मिरज येथील इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा.गौतम काटकर यांनी वज्रवाड येथे येऊन केला. हंपी येथील डॉ.कलवीर मंवाचार्य यांच्याकडून त्याचे वाचन करून घेण्यात आले. 1371 मध्ये या बसवेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.त्याचीच नोंद करण्यासाठी हा लेख कोरून ठेवण्यात आला. यावं काळात देवगिरीच्या यादवांची सत्ता नष्ट होऊन मुस्लिम राजसत्तेचा अंमल या भागावर होता. अशा काळात या मंदिराचा जीर्णोद्धार वज्रवाड येथील प्रसिद्ध व्यापारी गोपाळ शेट्टी यांचा मुलगा याने केला. सदर मूळ मंदिर म्हणजे शिवालय आहे. सध्या मात्र बसवेश्वर मंदिर या नावाने ते ओळखले जाते. या मंदिराची रचना आणि बांधणी वैशिष्ट्यपूर्ण असून ते उत्तर चालुक्यांच्या काळात बांधलेले असावे. 

वज्रवाड येथे जो शिलालेख सापडला आहे. त्या लेखात तत्कालीन प्रसिद्ध अशा वीरवणज या व्यापारी श्रेणीचा म्हणजे संघटनेचा उल्लेख आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या या गावात आढळलेल्या या शिलालेखामुळे सांगली जिल्ह्याच्या इतिहासात अभ्यासकांच्या दृष्टीने एक नवी भर पडली आहे. या व्यापाऱ्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी आणि जीर्णोद्धारासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती या शिलालेखाच्या अभ्यासातून स्पष्ट होते.

या शिलालेखात शके 1293 मध्ये साधारण नाम संवत्सराच्या फाल्गुन शुद्ध द्वितीयेला रोहिणी नक्षत्र असताना सिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार गोपाळ शेट्टी यांच्या मुलाने केला असल्याचे म्हटले आहे. तीन फेब्रुवारी सन 1371 अशी इंग्रजी तारीख येते. हे शिवालय असून त्याच्या अंगभोग आणि रंगभोगासाठी काही जमीन ब्राह्मणांना दान देण्यात आली आहे. शेवटी हा शिलालेख नष्ट करू नये, अशा आशयाचे वाक्य लिहिले आहे. सांगली जिल्ह्याच्या मध्ययुगीन इतिहासाच्या दृष्टीने या लेखाचे महत्त्व आहे.

Sunday, September 27, 2020

उमराणी येथील डफळे सरकार यांचा वाडा


जतच्या दक्षिणेला  कर्नाटक सीमेवर प्रतापराव गुजर यांच्या लढाईने प्रसिद्धीस आलेले  उमराणी गाव आहे.  प्राचीन इतिहास असलेल्या या गावाला अनेक राजसत्तांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. उमराणी येथील प्राचीन मंदिरात इ.स. ११ व १२ व्या शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात. यात कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दान दिल्याची नोंद येते. पण शिवकाळात उमराणी प्रसिद्धीस आले ते येथे घडलेल्या प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमामुळे.  इ.स. १६७३ साली राज्याभिषेकापूर्वी काही महिने  महाराज पन्हाळगडावर असताना अदिलशाही सरदार अब्दुल करीम बहलोलखान हा बारा हजार स्वार घेऊन स्वराज्यावर चाल करुन आला. ही वार्ता  समजताच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांस खानावर रवाना केले. त्यांना आज्ञा दिली की “खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे. महाराजांच्या आज्ञेनुसार  प्रतापराव बहलोलखानावर चालून गेले. यावेळी बहलोलखानाचा मुक्काम कर्नाटक सीमेवर असलेल्या उमराणी गावाजवळील डोण नदीकिनारी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम खानाचे पाणी तोडले व दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला केला. पाण्याशिवाय कासावीस झालेल्या खानाला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता. बेहलोलखानाने प्रतापराव व मराठा सैन्यासमोर शरणागती पत्करली. प्रतापरावांनी त्याला माफी दिली. शरण आलेला बहलोलखान मराठ्यांसमोर पराजीत होऊन मागे निघून गेला.  हि बातमी महाराजांना कळल्यावर ते चिडले. महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परत येईल अशी शंका त्यांना होती. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून “सला काय निमित्य केला?  असा जाब विचारला व तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले आणि यानंतरच नेसरी खिंडीत प्रतापराव यांचे बलीदान नाट्य घडले. याशिवाय उमराणी गावास असलेला इतिहास म्हणजे जत संस्थानाचे राजे डफळे सरदार यांचा इतिहास. डफळापूरचे  पाटील सटवाजी चव्हाण यांनी  १६८० च्या सुमारास आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर  डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले.  संभाजीराजांच्या मृत्युनंतर सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या १६००० सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला. पेशवाईत आऊसाहेब डफळे (१७०१–५४) यांनी पेशव्यांची अधिसत्ता मान्य करत संस्थानाचे  स्वतंत्र कायम ठेवले. दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्रिंबकजी डेंगळेकडे या संस्थानचा कारभार सोपविला होता. १८२० मध्ये इंग्रजांनी तह करून सातारच्या छत्रपतींची अधिसत्ता मान्य करविली. त्यानुसार १८४६ नंतर ३ वर्षे राजा अल्पवयीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता. सातारा खालसा झाल्यावर (१८४८) संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले. उमराणी गाव सांगली शहरापासुन ८३ कि.मी.वर असुन जत या तालुक्याच्या शहरापासून  २० कि.मी. अंतरावर आहे. जत संस्थाना अंतर्गत उमराणी हे एक महत्वाचे ठिकाण असल्याने डफळे घराण्याचे येथे अनेकदा वास्तव्य असे. उमराणी गावात आजही राजे डफळे यांची गढी असुन त्यांचे वंशज तेथे वास्तव्य करून आहेत.  सटवाजीराजे चव्हाण यांच्या नंतरच्या काळात  हि गढी बांधली गेली असावी. साधारण अर्धा एकर परिसरात पसरलेली हि गढी चौकोनी आकाराची असुन गढीच्या चार टोकाला चार बुरुज आहेत. सध्या या गढीचा वापर डफळे यांचे वंशज करत असुन त्यांनी या गढीला तिच्या मूळ स्वरुपात कायम ठेवले आहे. गढीबाहेर दरवाजा शेजारी आपल्याला गजलक्ष्मी  शिल्प पहायला मिळते. गढीची तटबंदी काही प्रमाणात ढासळली असुन या गढीच्या  चार टोकाला असलेले चार बुरुज व गढीचा दरवाजा आजही पहायला मिळतो. गढीच्या आवारात दगडात बांधलेली  खोल विहीर असुन डफळे यांचा चौसोपी वाडा आहे.  गढीतील या वाड्याचे बांधकाम आजही मूळ  स्थितीत बांधकामातील लाकडावर अतिशय सुंदर कोरीवकाम केले आहे. वाड्यात राजे डफळे यांचे वास्तव्य असल्याने मर्यादित भागात प्रवेश दिला जातो.  गावात फेरी मारताना काही प्राचीन मंदिरे पहायला मिळतात. उमराणी गढी व आसपासचा परिसर  पहाण्यास दोन तास पुरेसे होतात.



Saturday, September 12, 2020

सामुहाहिक विवाहाची मुहूर्तमेढ रोवणारे संगतीर्थ


महाराष्ट्र-कर्नाटकतल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. धानम्मादेवीच्या विवाहस्थळाला म्हणजेच संगतीर्थ(वळसंग) या धार्मिक स्थळाला श्रावण मासात भाविक मोठ्या संख्येने भेट देऊन तृप्त होतात.जतसारख्या दुष्काळ ओसाड भागात काहीशा दरित वसलेले हे निसर्गरम्य तीर्थक्षेत्र म्हणजे वाळवंटातले ओअ‍ॅसिस म्हटले पाहिजे. श्रावणात भाविकांबरोबरच शाळांच्या सहलीदेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात.

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी जत तालुक्यातले श्रीक्षेत्र गुड्डापूर येथील धानम्मादेवीचे मंदिर म्हणजे एक जागरूक देवस्थान मानले जाते. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातले लाखो भाविक मोठ्या संख्येने इथे येत असतात. गुड्डापूरला भेट देण्याआधी भाविक संगतीर्थला आवश्य भेट देतात.वळसंग गावापासून सोरडी मार्गावर अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर संगतीर्थ आहे. धानम्मा हिचा जन्म उमराणी गावचा असला तरी  संगतीर्थ इथे तिने 21 दिवस तपश्‍चर्या केली. हा काळ बाराव्या शतकातला असून ज्या वडाच्या झाडाखाली धानम्माने तपश्‍चर्या केली, ते झाड आजही इथे दिमाखात उभे आहे. त्याच्या थंडगार सावलीखाली विसावा घेणार्‍या भाविकांना एक प्रकारे धार्मिक समाधान मिळते.

धानम्माच्या तपश्‍चर्येमुळे भाविक तिच्या दर्शनाला येत राहिले. मात्र या वाळवंट परिसरात पाण्याचा थेंबदेखील नव्हता.  लोकांच्या सांगण्यावरून धानम्माने इथे शंख फुंकला आणि इथे गंगा अवतरली, अशी अख्यायिका आहे.त्यामुळे या ठिकाणाला संखतीर्थ म्हटले जात होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन संगतीर्थ असे नाव या क्षेत्राला पडले. या मंदिराचा पायथ्याशी जिवंत झरा असून बारमाही या ठिकाणी पाणी असते. त्यामुळे या परिसरातल्या लोकांना , भाविकांना पाण्याची टंचाई कधी भासली नाही. इथले पाणी प्यायला गोड, मधुर आहे. भाविक पिण्याच्या बाटल्या भरून तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात.

धानम्मा पुढे कुडलसंगम(कर्नाटक) इथे गेली. तिथेही तिने तपश्‍चर्या केली. पुढे कुडलसंगमचा सोमेश्‍वर आणि धानम्मा यांचा विवाह संगतीर्थ इथे झाला. या ठिकाणी 501 जोडप्यांचा सामुदायिक विवाह पार पडला. त्यात सोमेश्‍वर आणि धानम्मा यांचाही समावेश होता. ही सामुदायिक विवाहाची मुहूर्तमेढ होती. त्यानंतर इथे सामुदायिक विवाह होऊ लागले. आजही इथे विवाह होतात. श्रावणात दरवर्षी तिसर्‍या सोमवारी इथे अक्षता पडतात. भाविक धानम्माचा विवाह उत्सव साजरा करतात. या ठिकाणी वडाच्या पारंब्यातून निर्माण झालेल्या खोडाला श्री गणेशाची स्वयंभू प्रतिमा तयार झाल्याचे आपल्याला दिसते.

हा परिसर निसर्गरम्य असा असून वळसंगच्या श्री. धानम्मा ट्रस्टने भाविकांच्या निवासासाठीही अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. बारा महिने याठिकाणी अन्नछत्र (दासोह) उघडण्यात आले आहे. भाविक मोठ्या भक्तीभावाने त्याचा प्रसाद म्हणून आस्वाद घेतात. पावसाळ्यातली किंवा श्रावणातील सहकुटुंब छोटी सहल म्हणून या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला काहीच हरकत नाही. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

Monday, July 6, 2020

जालिहाळ बुद्रुकची स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल

ग्रामविकासाच्या अनेकजण गप्पा मारतात, सरकारी पातळीवर तर रामराज्यापासून स्मार्ट व्हिलेजपर्यत अनेक घोषणा झाल्या पण देशातील व महाराष्ट्रातील खेडी सुधारणांपासून, विकासापासून कोसो मैल दूर राहिली, स्थलांतर होत राहिली. शहरात गर्दी वाढली. ना ग्रामविकास ना शैक्षणिक सुधारणा, ना शेतीला पाणी, ना हाताला काम. पूर्वजन्मीचं पाप म्हणून कायमस्वरूपी दुष्काळी भागात जन्माला यायचं आणि दुष्काळी पट्ट्यातच विकासापासून वंचित आयुष्य कसं बसं ओढायचं असं निराश, हताश जीवन जगणाऱ्या जनतेला एक आशेचा दीप गवसलाय येरळा प्रोजेक्ट सोसायटी आणि जालिहाल पॅटर्न.

Monday, June 15, 2020

विद्यावाचस्पती भीमराव कुलकर्णी

मराठी समीक्षेतील एक बलदंड नाव म्हणजे डॉक्टर भीमराव कुलकर्णी हे होय. ते आपल्या जतचे असल्यामुळे समस्त सांगली जिल्हयाला त्यांच्याबद्दल अत्यंत रास्त असा अभिमान आहे. प्रतिकुल परिस्थितीशी झगडत झगडत त्यांनी शिक्षण घेतले. जिद्दीच्या बळावर उच्चशिक्षण घेतले. पुण्यासारख्या
विद्यानगरीत अव्वल दर्जाचे व्यासंगी प्राध्यापक असा
लौकीक प्राप्त केला आणि वा. ल. कुलकर्णी, गो.
म. कुलकर्णी अशा दिग्गज समीक्षकांच्या पंक्तीत आपलेही मानाचे पान निर्माण केले. आणि हे जे सारे त्यांनी केले ते केवळ स्वबळावर साध्य केले म्हणून त्यांचे आजही अप्रूप वाटते. विद्यावाचस्पती भीमराव कुलकर्णी यांच्या अकाली निधनाचा त्यावेळी मराठी समीक्षा क्षेत्रावर मोठाच आघात झाला होता.

दुष्काळी भागाचा आधार दोड्डनाला तलाव

जत तालुक्यातील उमदी,उटगी, सोन्याळ, जाडरबोबलाद, निगडी बुद्रुक या गावांना जलस्वराज्य व भारत निर्माण अंतर्गत पिण्याच्या पाण्याची योजना प्रस्तावित आहे. मात्र परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला मात्र दोड्डनाला तलावातील पाण्याचा उपयोग होत आहे. जत तालुक्यासह सर्वत्र1972 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळामुळे इथल्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. खायला अन्न नव्हते, अशा परिस्थितीत शासनाने 1985 च्या दरम्यान मध्यम प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.

मांसासाठी प्रसिध्द माडग्याळी मेंढी

राज्यात मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माडग्याळ’ मेंढीच्या संवर्धनासाठी तिचे उगमस्थान असलेल्या सांगली जिल्ह्यातील माडग्याळ (ता. जत) गावात संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन करण्याची गरज आहे. देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी ‘माडग्याळ’ ही जात आहे. त्यामुळे ‘माडग्याळ’चे संगोपन व संवर्धन केल्यास राज्यातील मांस उत्पादनात वाढ होऊन निर्यातीस चालना मिळेल, असा हेतू आहे.

Saturday, June 6, 2020

जत परिसरातील रूढी,परंपरा

शुद्ध शाकाहारी बनाळी
जतपासून अवघ्या 10-11 किलोमीटर अंतरावर असणारं बनाळी गाव. 40 एकर जमिनीवरील झाडीत हे गाव वसलेलं आहे. हे बनशंकरी देवीचं जागृत देवस्थान. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावात मांसाहार करणारा कोणी शोधूनही सापडत नाही. कारण कोणी मांसाहार केलेला येथील देवीला चालत नाही. जर तो कोणी केला तर त्याच्यावर येथील मधमाशा हल्ला चढवितात,असं सांगितलं जातं. गावात जाणारा पाहुणा असला तरी तो यातून सुटत नाही. अशा अनेक घटना गावात घडल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे भितीपोटी गावात कुणीही मांसाहार करत नाही. शिवाय मांसाहार करून कोणी गावाच्या शिवारात पाऊल ठेवत नाही. शिवाय गावात होणारा नवरात्र उत्सव खूप मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसात गावातील लोक कडकडीत उपवास करतात या दिवसात हे लोक साधं पाणीही पीत नाहीत.

जत पंचायत समितीची वाटचाल


जत पंचायत समितीची स्थापना 1962 मध्ये झाली. तालुक्यात 124 महसुली गावे असून 117 ग्रामपंचायती आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. पूर्व-पश्चिम लांबी 120 किलोमीटर, तर दक्षिण उत्तर लांबी 67 किलोमीटर इतकी आहे. पंचायत समितीची स्थापना झाल्यानंतर स्वतःची प्रशासकीय इमारत नव्हती. त्यामुळे जत शहरातील महाराणा प्रताप चौकालगत असलेल्या बनाळी यांच्या भाड्याच्या इमारतीत पंचायत समितीचे सुरुवातीला कार्यालयीन कामकाज सुरू झाले होते. 1968-69 दरम्यान जत तहसील कार्यालयालगत जत पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम बांधकाम व्यावसायिक खान यांनी पूर्ण केले.